Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मौलाना आझाद शिष्यवृत्तीत महाराष्ट्र तिसरा


नवी दिल्ली दि. २८ : अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने देशातील अल्पसंख्याक समाजाच्या गुणवंत मुला-मुलींसाठी ‘एमफील व पीएचडी’ या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी वर्ष २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षात ३ हजार २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती मिळविली असून राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशातील ४५० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली असून या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो तर पश्चिम बंगालमध्ये ३२४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील बौध्द, ख्रिश्चन, जैन, मुस्लीम, पारसी, शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुला-मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. राज्यात मुस्लीम समाजातील सर्वात जास्त १४१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, यात ८६ मुलींचा तर ५५ मुलांचा समावेश आहे. बौध्द समाजातील ७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून यात, ४५ मुली व ३३ मुलांचा समावेश आहे. जैन समाजातील ९ मुली व ६ मुले अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ख्रिश्चन समाजातील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, यात ८ मुली व २ मुलांचा समावेश आहे. शीख समाजातील ३ मुली व १ मुलगा अशा चार तर पारसी समाजाच्या एका मुलाला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) मानांकन प्राप्त देशातील विद्यापीठ व संस्थामध्ये एमफील व पीएचडी या संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजनेंतर्गत संशोधनाच्या ५ वर्षाच्या कालावधीसाठी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom