Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ई-रेल्वे तिकीटमधून विमा कंपन्यांना २ वर्षांत मिळाले ३७ कोटी


मध्य प्रदेश / इंदोर - ऑनलाईन तिकीट विमा योजनेच्या माध्यमातून गत दोन वर्षांत खासगी क्षेत्रातील तीन कंपन्यांना ३७.१४ कोटींचा प्रीमियम मिळाला. तर या कालावधीत सदरील कंपन्यांनी विम्याचे ४८ दावे मंजूर करीत ४.३४ कोटींची नुकसानभरपाई दिल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे..
रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट विमा योजनेत किती प्रीमियम मिळाला आणि किती जणांना विम्याचा लाभ मिळाला याविषयीची माहिती मध्य प्रदेशातील नीमचचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी मागविली होती. याच्या उत्तरात आयआरसीटीसीच्या एखा संयुक्त महाव्यवस्थापकांनी वरील माहिती दिल्याचे गौड म्हणाले. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१७-१८ दरम्यान ई-तिकीट बुक करणाऱ्या ४३.५७ कोटी प्रवाशांना विमा योजनेचे संरक्षण प्रदान करण्यात आले. या कालावधीत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सला १२.४० कोटी, रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्सला १२.३६ कोटी व श्रीराम जनरल इन्शुरन्सला १२.३८ कोटींचा प्रीमियम मिळाला. या कालावधीत तिन्ही कंपन्यांना विम्याचे १५५ दावे मिळाले. यापैकी कंपन्यांनी ४८ दावे मंजूर करीत एकुण ४.३४ कोटींची नुकसानभरपाई दिली. याच कालावधीत ५५ दावे बंद करण्यात आले तर ५२ दाव्यांवर विचार केला जात असल्याचेही यातून समोर आले आहे.

ऑनलाईन रेल्वे तिकिटांवर विम्याची योजना सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. यानंतर १० डिसेंबर २०१६ पासून ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांचा प्रीमियम सरकारकडून भरण्यात येतो. सध्या ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विमा प्रीमियमपोटी सरकारकडून संबंधित कंपनीला ६८ पैसे दिले जातात. विम्याचे संरक्षण प्राप्त प्रवासी रेल्वे दुर्घटनेदरम्यान जखमी किंवा मृत झाल्यास योजनेअंंतर्गत कमाल १० लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom