नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था गतिमान वाढीसाठी तयार असून देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०२५ पर्यंत दुप्पट होईल व ५००० अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकेल, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी व्यक्त केली. भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेच्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते.पुढील दशकामध्ये भारतीय नवी झेप घेण्यासाठी तयार आहे. चार्टर्ड अकाऊंटंट हे जनहिताचे रक्षक असून, देशाच्या करप्रणालीला व करदात्यांना सुविधा देण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.निष्पक्ष करप्रणालीच्या पालनाची अतिशय गरज असून, त्यामुळे सरकारला महसूल मिळतो, त्यापेक्षा त्याचे महत्त्व अधिक आहे.या वेळी कॉर्पोरेट कामकाज मंत्री पी. पी. चौधरी हेही उपस्थित होते. ते म्हणाले की, सरकारची काळ्या पैशांविरोधातील लढाई चालूच राहील. आतापर्यंत या कामामध्ये सव्वादोन लाख बेनामी कंपन्यांना हुडकून काढण्यात आले आहे.