मुंबई -नगरसेवकांना त्यांच्या नगरसेवक ादाच्या कालावधीत आवश्यक तो निधी उपलब्ध करून त्यामधून त्यांच्या प्रभागातील उपलब्ध मोकळ्या जागा, शाळा, उद्याने अशा ठिकाणी ५० झाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे बंधनकारक करावे, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली आहे.
मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर निवासी बांधकामे, व्यावसायिक संकुले उदयास येत आहेत. या बांधकामाआड येणारी झाडे कापली जातात. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन वेळीअवेळी पाऊस पडणे, पावसाचे कमी-अधिक प्रमाण, तापमानातील फरक असे विपरीत बदल होतात. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून रोखण्यासाठी वृक्षारोपण हा उत्तम उपाय आहे. विविध स्तरांवर व विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते, परंतु ती झाडे तग धरत नसल्याचे समोर आले आहे. विविध प्रभागाच्या व संपूर्ण मुंबई शहराच्या विकासात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे नगरसेवकांनी इतर कामांसोबत वृक्षारोपण केलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे नगरसेवकांना त्यांच्या नगरसेवकपदाच्या कालावधीत आवश्यक तो निधी उपलब्ध करून मोकळ्या जागा, शाळा, उद्याने अशा ठिकाणी ५० झाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे बंधनकारक करावे. त्यामुळे नागरिकांनाही प्रोत्साहन मिळेल. तसेच वृक्षरोपण मोहीम यशस्वी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असेही ठरावाच्या सूचनेद्वारे म्हटले आहे.