मुंबई - निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर नको, या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. ईव्हीएमच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांचे एकमत व्हावे, यासाठी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही हे पत्र त्यांनी पाठवले आहे. शिवसेनेने आधीच ईव्हीएमला विरोध केला आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर शिवसेना आता मनसेला काय प्रतिसाद देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवडणुकांत मतदान यंत्रे फोल ठरली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅटचाही गोंधळ झाला असल्याचे कारण देत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात, असे पत्र दिले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमला विरोध केला आहे. ईव्हीएमविरोधात राज ठाकरे यांनी याआधीही वक्तव्य केले होते. आता तर ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय एकमत व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसे पत्र त्यांनी राजकीय पक्षांना पाठवले आहे. ईव्हीएम विरोधाच्या मुद्द्यावर शिवसेना आता मनसेला काय प्रतिसाद देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.