Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात मतदार याद्यांचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर


मुंबई - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयाद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारूप मतदारयादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती/सुधारणा करायच्या असल्यास अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येणार आहे..

मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी शनिवार, १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा शनिवार, १ सप्टेंबर ते बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१८ असा असणार आहे. दावे व हरकती निकालात काढण्यासाठी शुक्रवार, ३० नाव्हेंबर २०१८ पूर्वीची मुदत दिली गेली आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई गुरुवार, ३ जानेवारी २०१९ पूर्वी केली जाणार असून अंतिम मतदार यादी शुक्रवार, ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

१ जानेवारी २०१९ रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख १ जानेवारी २००१ वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत, अथवा प्रारूप मतदारयादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती/सुधारणा करायच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom