मुंबई - 'क्लीनअप' मार्शलची वादग्रस्त परंपरा अद्यापि कायम असून त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. मार्शलकडून होणारी मनमानी कारवाई आणि कामात होणाऱ्या दिरंगाईिवरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई होणार आहे. यामध्ये 'क्लीनअप' मार्शलविरोधात तिसऱ्यांदा तक्रार आल्यास कंत्राटदाराला १० ते २० हजारांचा दंड होणार असून संबंधितांना काळ्या यादीतही टाकण्यात येईल. 'क्लीनअप' मार्शलविरोधात वाढलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईत नागरिक, प्रवासी आणि वाहतूकदारांकडून होणाऱ्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने २००७ पासून 'क्लीनअप' मार्शल संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या 'क्लीनअप' मार्शलकडून मोठ्या प्रमाणात 'वसुली' होत असल्याचा तक्रारी येत असतात. काही वेळा 'क्लीनअप' मार्शलविरोधात थेट पोलीस तक्रारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. यापूर्वी 'क्लीनअप' मार्शल योजना वादात सापडून बंद करण्यात आली होती. आता पुन्हा वादाची परंपरा कायम ठेवली आहे. वाढत्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला हे काम वाढवून देताना नगरसेवकांनीही जोरदार विरोध केला आहे. मात्र, मुंबईतील स्वच्छतेच्या दृष्टीने 'क्लीनअप' मार्शलची अनिवार्यता लक्षात घेऊन 'एन' आणि 'बी' वॉर्ड वगळता सर्व वॉर्डमध्ये प्रत्येकी २० ते २२ 'क्लीनअप' मार्शल सध्या काम करत आहेत. रहिवासी, प्रवासी अस्वच्छता करताना आढळल्यास त्यांच्याकडून रोख दंडही वसूल केला जात आहे. मात्र, या 'क्लीनअप' मार्शलच्या मनमानी विरोधात वाढलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये एखाद्या कंत्राटदाराविरोधात तिसऱ्यांदा तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.