मुंबई - करदात्यांच्या पैशातून नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडून विविध कामे केली जातात. मात्र, काही समाजकंटकांकडून अशा सुविधांचा गैरवापर, नासधूस केली जाते. त्यामुळे यापुढे अशा समाजकंटकांवर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यासाठी आता नामनिर्देशित अधिकारी नेमण्यात यावा, याबाबतच्या ठरावाच्या सूचनेला विधी समितीत मंजुरी मिळाली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी रस्ते बांधून त्यावर दिव्याचे खांब उभारणे, दुभाजक बांधणे, वाहतूक बेटे बांधणे व तेथे हरितपट्टा तयार करणे, जलवाहिन्या, मलनि:सारण तयार करणे तसेच पदपथ, मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने बांधणे अशी विविध कामे केली जातात. मात्र, काही समाजकंटकांकडून अशा सर्व सुविधांचा गैरवापर केला जातो. यामधील पदपथावरील लाद्या, पेव्हर ब्लॉक काढणे, उद्यानातील बाके उखडणे, तोडणे, उद्यानातील नळ काढून टाकणे, गटारांची झाकणे चोरणे, असे प्रकार समाजकंटकांकडून केले जातात. समाजकंटकांच्या अशा कारवायांमुळे पालिका प्रशासनाने केलेल्या कामाचा उपयोग नागरिकांना होत नाही. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होतो. यामुळे प्रशासनाची प्रतिमाही डागाळते. त्यामुळे अशा समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी नामनिर्देशित अधिकारी नेमावा, अशी ठरावाची सूचना सपाचे गटनेते रईस शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी केली होती. या सूचनेला विधी समितीत मंजुरी मिळाली.