मुंबई, दि. 29 : कोकणातील नाणार हा रिफायनरी प्रकल्प जनतेवर लादणार नाही. स्थानिक जनतेची सहमती असेल तरच हा प्रकल्प होईल. जनतेच्या भावना महत्त्वाच्या असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
सदस्य अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना देसाई बोलत होते. नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सौदी अरेबिया येथील अरामको या कंपनीशी राज्य शासन स्तरावर सामंजस्य करार झालेला नाही. कायद्यातील तरतुदीनुसार भूधारकांच्या संमतीनेच भूसंपादन करण्याचे धोरण शासनाने मान्य केले असल्याने रिफायनरी प्रकल्पाचे भूसंपादन भूधारकांच्या संमतीखेरीज करण्यात येणार नसून सद्यस्थितीत कुठलेही काम सुरू नसल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सदस्य राहुल नार्वेकर यांनी भाग घेतला.