मुंबई - प्रदुषणात आपले जीवन जगणाऱ्या माहुलवासियांचे लवकरच पुनर्वसन केले जाणार आहे. बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका, ‘म्हाडा’, ‘एसआरए’ अधिकार्यांसह प्रकल्पग्रस्तांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माहुलवासीयांचे स्थलांतर कुर्ला येथील संक्रमण शिबिरात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १६ नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे.
पालिकेच्या विविध विकासकामांधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चेंबूरजवळच्या माहुलमध्ये करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षात तब्बल साडेपाच हजारांवर प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर माहुलमध्ये करण्यात आले आहे. मात्र या परिसरात असणार्या केमिकल कंपन्यांच्या प्रदुषणामुळे शेकडो रहिवाशांना टीबी, कॅन्सर, दम्यासारख्या आजारांनी जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर माहुलचा परिसर रहिवाशांना राहण्यायोग्य नसल्यामुळे त्यांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. मात्र पालिका किंवा राज्य सरकारकडून याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या अठरा दिवसांपासून माहुलवासीयांनी विद्याविहार येथे ठिय्या मांडून रस्त्यावरच संसार मांडले आहे. दरम्यान, संतप्त रहिवाशांनी रविवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घरावर थेट धडक दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुर्ला येथील एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात करण्याचे आश्वासनही मेहता यांनी दिले आहे. ही प्रक्रिया तातडीने करावी यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्य सरकारने ही घरे ताब्यात दिल्यानंतर तातडीने माहुलवासीयांचे स्थलांतर कुर्ला येथे करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, ‘म्हाडा’च्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे विनोद घोसाळकर, रमेश कोरगावकर, अशोक माटेकर आदी उपस्थित होते.
निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार -
राज्य सरकारकडून माहुल प्रकल्पग्रस्तांना कुर्ला येथे स्थलांतर करण्याचे आश्वासन मिळाले असले तरी जोपर्यंत प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक रेखा घाडगे यांनी सांगितले.