मुंबई : माहुलमध्ये प्रदूषण असल्याने माहुलवासियांचे पुनर्वसन करण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी म्हाडाकडून माहुलवासियांना ३०० घरे दिली जात आहेत. ही घरे म्हाडा आणि पालिकेच्या माध्यमातून दिली जाणार असून असाच पुढाकार राज्य सरकार आणि त्यांच्या इतर यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले.
माहुलवासीयांच्या ५६ दिवस सुरु असलेल्या आंदोलनाला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह सामंत यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे म्हाडामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ही घरे दिली जात आहेत. ही घरे कोणाला द्यायची त्याचा निर्णय माहुलवासीयांच्या समितीने घ्यावा अशी सूचना सामंत यांनी केली. मुख्यमंत्र्यानी माहुलवासियांच्या पुनर्वसनाबाबत नेमलेल्या समितीमध्ये एमएमआरडीए आणि नगर विकास विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असे आश्वासन उदय सामंत व आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिले. मुख्यमंत्र्यानी नेमलेली समिती पालिका आयुक्तांच्या अध्यखतेखाली असल्याने या समितीची बैठक लवकरात लवकर घ्यावी यासाठी आयुक्तांना सूचना करू असे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले. दरम्यान ३०० घर मिळाली असली तरी जो पर्यंत ५ हजार ५०० प्रकल्पग्रस्तांना घरे मिळत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. म्हाडाकडून ३०० घरे मिळाल्याने तसेच मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याने आझाद मैदानातील आंदोलन मागे घातले असले तरी विद्याविहार येथे सुरु असलेले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकर्त्यानी सांगितले.