मुंबई - इव्हीएम मशीनवरून देशभरात अनेक.उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यातच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या इव्हीएम मशीन हॅकिंगची माहिती असल्यानेच झाली असा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टने केला आहे. सय्यद सुजा याने लंडन येथे एका गुप्त ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. सय्यद शुजाच्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचा राजधानी दिल्लीमध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूवर अनेक संशय घेतले गेले. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच मुंडेंचं निधन झाल्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली गेली. त्यानंतर कित्येक दिवस गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरून तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, आता सय्यद शुजाच्या या दाव्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूभोवतीचं गूढ अजूनच वाढलं आहे. ‘या अत्यंत गोपनीय माहितीमुळे आपल्यावर काही दिवसांपूर्वी हल्ले देखील करण्यात आले होते. त्यामुळे गुप्त ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करत असल्याचं’, सय्यद शुजानं सांगितलं आहे. शुजाच्या दाव्यानुसार २००९ ते २०१४ या कालावधीत तो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा कर्मचारी होता. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. त्याने पुढे जाऊन असाही दावा केला आहे की, ‘२०१५मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रकारे इव्हीएम मशिनमध्ये फेरफार करून घोळ करण्यात येणार होता, मात्र वेळीच मध्ये पडून आम्ही दुर्घटना रोखली’, असं शुजा त्याच्या पत्रकार परिषदेत म्हणाला आहे. ‘या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्याच जागा भाजपला मिळून भाजपनं निवडणुका जिंकल्या असत्या’, असा दावा देखील शुजानं केला आहे.