मुंबई - मेट्रोच्या कामांमुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत आहे. ही नुकसान भरपाई मेट्रोकडून वसूल करावी, असी जोरदार मागणी राष्ट्रवादीने स्थायी समितीत केली. तसेच नऊ दिवस सुरु असलेल्या बेस्ट संपाबाबत सभा तहकूबी मांडली. मात्र, शिवसेना- भाजपने आपल्या बहूमताच्या जोरावर ही तहकूबी नामंजूर केली.
बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीला बेस्ट प्रशासन तसेच राज्य शासन जबाबदार आहे. मुंबईत मेट्रोने अनेक ठिकाणी खोदकामे केली आहेत. खोदकामांमुळे वाहतूक मंदावते. परिणामी फेऱ्यांमध्ये कपात झाली आहे. बस मार्ग वळविण्यात आले असून रस्त्यांवरील बस थांबे देखील उखडण्यात आले आहेत. बेस्टला वाढत्या इंधनाचा फटका देखील असून बेस्टचा हा खर्च वाढला. या सर्व बाबींचा विचार करून मेट्रोने बेस्टला नुकसान भरपाई द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या पालिका गटनेत्या मागणी राखी जाधव यांनी स्थायी समितीत केली. तसेच संपाबाबत तहकूबी मांडली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तहकूबीला पाठिंबा दिला. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेस्ट संपाचे प्रकरण न्यायालयाने मिटवले, असल्याचे सांगत तहकुबी मागे घेण्याची सूचना राखी जाधव यांना केली. मात्र जाधव यांनी तहकुबी मागे घेण्यास नकार दिल्याने यावर मतदान घेण्यात आले. शिवसेना- भाजपने तहकूबीच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे बहुमताने तहकुबीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.