Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भूखंडांवरून पालिका सभागृहात गदारोळ

मुंबई - मुंबईतील आरक्षित भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याच्या विरोधी पक्षाच्या आरोपावरून सोमवारी पालिका सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. भाजपने विरोधीपक्षाला पाठिंबा दिल्याने शिवसेना सभागृहात एकाकी पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूखंडांचे वादग्रस्त प्रकरण शिवसेनेच्या अडचणी वाढवणारे ठरण्याची शक्यता आहे.  

गेले काही महिने मुंबईतील आरक्षित भूखंड घोटाळे प्रकरण महापालिकेत गाजत आहेत. कुर्ला येथील ६०० कोटीचा भूखंडाच्या खऱेदी सूचनांचा प्रस्ताव सुधार समितीत दप्तरी दाखल करून बिल्डरच्या बाजूने निर्णय घेतल्याने शिवसेना टीकेचे लक्ष्य बनले. प्रकरण शेकल्याने या प्रकरणी यू टर्न घेत शिवसेनेला हा प्रस्ताव सभागृहात परत आणावा लागला. यातून धडा न घेता नव्या वर्षाच्या प्रारंभी पोयसर, गोरेगाव येथील सहा आरक्षित भूखंडाचा प्रस्तावही दप्तरी दाखल करून शिवसेनेने बिल्डरांना मदत केल्याचा विरोधकांनी आरोप करून शिवसेनेला पुन्हा अडचणीत आणले. सोमवारी सभागृहात विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी यावर निवेदन करून प्रशासनासह शिवसेनेला जाब विचारला. विरोधी पक्षासह भाजपही आक्रमक झाल्याने शिवसेना सभागृहात एकाकी पडल्याचे चित्र दिसले. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव तसेच भाजपचे गटनेते रईस शेख यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. यानंतर सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याऐवजी जुनी प्रकरणे उकरून काढून विषय भरकटवल्याने भाजप व विरोधी पक्ष आक्रमक झाले. शोर है शोर है शिवसेना चोर है, लांडे मामा चोर है, परत घ्या परत घ्या सहा भूखंड परत घ्या आदी घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. भाजपचे नगरसेवकही विरोधकांसोबत घोषणा देत उभे राहिल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवकही उभे राहीले. सत्ताधारी - विरोधीपक्ष आमने - सामने आले. विरोधकांनी जवळपास अर्धातासाहून अधिक वेळ घोषणाबाजीने हल्लाबोल करीत शिवसेनेची कोंडी केली. सभागृहात आतापर्यंत पहारेक-यांची भूमिका बजावत विरोध दर्शवला तरी शिवसेने सोबतच असल्याचे दाखवणा-या भाजपने यावेळी शिवसेनेला एकटे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. प्रचंड गदारोळ, कागदी बोळे फेक, कागदी विमाने सोडून शिवसेनेला टिकेचे लक्ष्य केले. अखेर प्रचंड गदारोळात भूखंडाबाबतच्या प्रस्तावावर काहीच निर्णय न घेता दुसरा विषय घेऊन महापौरांनी सभागृह सुरु ठेवले. 

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना- भाजप आमने - सामने
लोकसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले असताना भूखंड प्रकरण शिवसेनेवर शेकवत पालिकेतील विरोधी पक्षांनी बाजी मारली आहे. यात शिवसेना - भाजप यांच्यातील वादामुळे युती होण्याची शक्यता धूसर झाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युती होणार का हा प्रश्न उपस्थित झाला असताना भूखंड प्रकरणावरून भाजपने शिवसेने विरोधात दंड थोपटल्याने दोन्हींमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे - शिवसेना
आरक्षित मोकळे भूखंड कोणाच्याही घशात घालू देणार नाही. सहा भूखंडाबाबत शिवसेना सभागृहात भूमिका मांडणार होती. विरोधकांनी ती ऐकून घ्यायला हवी होती. परंतु, भाजपसह विरोधकांनी गोंधळ घालून बिनबुडाचे आरोप केले. सुधार समितीत आरक्षित भूखंडाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. कॉंग्रेसच्या सदस्यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मत मांडली होती. मग कॉंग्रेसने बिल्डरांसोबत सेंटीग केली का, असा आरोप करायचे का, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. तसेच सहा पैकी पाच भूखंड हे एकाच मालकाचे असताना प्रशासनाने वेगवेगळे प्रस्ताव का बनवले, याचा जाब विचारण्याची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनेची आहे. शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे एकही भूखंड सोडणार नाही, असा दावा जाधव यांनी केला.

भाजपच्या बूडाखाली अंधार --
भूखंडाप्रकरणी भाजपने सभागृहात शिवसेनेवर तोंडसूख घेतले. शिवसेना भूखंड चोर असल्याचे आरोप केले. यावर शिवसेनेकडून प्रतिउत्तर देताना, भाजपच्या खासदारांनी तब्बल ९ भूखंड लाटले आहेत. तेच भाजप सहा भूखंडाबाबत आम्हाला ज्ञान देवू नये. भाजपने आपल्या बूडाखालील अंधार बघावा, असा टोला शिवसेनेने लगावला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom