मुंबई - सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचा दावा केला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते असे सांगितले जात असले तरी साताऱ्यातील शेतकऱ्यांना आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अर्धनग्न मोर्चा काढावा लागला आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावातील 100 ते 150 शेतकरी अर्धनग्न मोर्चा घेऊन मंत्रालयावर निघाले आहेत. या मोर्चेकऱ्यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच म्हणजे मानखुर्द येथे अडवले. मोर्चकरी शेतकऱ्यांना पोलीस वाहनाद्वारे आझाद मैदानात नेले जाणार आहे. मोर्चेकरी शेतकऱ्यांनी पायी जाण्याचा अट्टाहास केला आहे. त्यामुळे मोर्चेकरी खाडी पुलाजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या बदल्यात योग्य मोबदला, तसेच स्थानिकांना काम, यासाठी हा मोर्चा आहे.