मुंबई, दि.12 : राज्यात सर्वत्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श संहिता सुरु आहे. या आदर्श आचार संहितेचे सर्व संबंधित घटकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचार संहितेचे पालन व निवडणूक विषय महत्वाच्या बाबी संदर्भात बैठक झाली.
आदर्श आचार संहितेचे पालन, व संदर्भातील सुचना, मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदान केंद्राची रचना, तेथील सुविधा, मतदार याद्या बद्दल माहिती,उमेदवाऱ्यांच्या दैनिक खर्चाबाबत सुचना, वस्तूं बाबतचे प्रमाणित केलेले दरपत्रक, संवेदनशिल मतदान केंद्रासंदर्भात घेण्यात येणारी विशेष उपायोजना, एव्हीएम संदर्भात असलेले भारत निवडणूक आयोगाचे निर्देश, जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती आदीबाबत सविस्तर माहिती जोंधळे यांनी उपस्थितांना दिली. या वेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार, मुंबई दक्षिण लोकसभा मतदाराचे निवडणूक निर्णय अधिकारी, बन्सी गवळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, फरोग मुकादम व तसेच विविध राजकीय पक्षाचे अधिकारी उपस्थित होते.