यवतमाळ - लोकसभा निवडणुका दारात आहेत. देशात आचारसंहिता लागू झालेली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. जुन्या नोटा चलनात आणू, असं म्हणणाऱ्या आंबेडकरांनी पुन्हा एक बॉम्ब टाकला असून आमचं सरकार सत्तेत आल्यास निवडणूक आयोगालाही तुरुंगात पाठवणार, असं प्रकाश आंबेडकर यवतमाळ येथील रॅलीला संबोधताना म्हणाले. याबाबत निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकर यांना नोटिस पाठवली आहे.
पुलवामाबद्दल बोलू नका, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. मात्र आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार घटनेनं दिला असताना अशा पद्धतीनं का रोखलं जातं, असा सवाल आंबेडकरांनी यवतमाळमध्ये रॅलीला विचारला. आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं. दरम्यान या प्रकरणाकडे निवडणूक अधिका-यांनी जातीने लक्ष घातले असून, आयोगाने महाराष्ट्र भारिप महासंघाच्या कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमार्फत प्रकाश आंबेडकरांनी असे विधान का केले, याचा रिपोर्ट तयार करण्याची सूचना महाराष्ट्रातील सर्व भारिप कार्यालयाला दिली आहे. आंबेडकरांनी निवडणूक आयोगासाठी असे शब्द का वापरले याचे उत्तर या नोटीसद्वारे निवडणूक आयोगाने मागवले आहे.
गुन्हा नोंदवला -मुंबई, दि. 04: भारत निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय रिपब्लिकन पार्टी - बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. निवडणूक आयोगाबाबत अॅड.आंबेडकर यांनी काल दिग्रस (जि. यवतमाळ) येथे झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.