मुंबई - गेल्या पाच वर्षांत या सरकारने फक्त घोषणाबाजीच केली. विकासाचे काहीच काम केलेले नाही. शिवाय या सरकारला संसदीय लोकशाही सुद्धामान्य नाही. या देशात त्यांना वेगळ्या प्रकारची हुकूमशाही आणायची आहे. हे जनतेला ठावूक झाल्यानेच जनता भाजप-शिवसेना युतीचा पराभव करेल, असा विश्वास दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीतर्फे एकनाथराव गायकवाड यांनी दुपारी दोनच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखलकेला. यावेळी त्यांच्यासोबत माजी चंद्रकांत हांडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित हाेते. दक्षिण मध्य मुंबईसह मुंबईतील सर्व मतदारसंघात येत्या २९ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील या मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपत आहे.