Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

संरक्षण दलांना बळकटी देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. भारताची तीनही संरक्षण दल अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना बळकटी देऊन त्यांच्यात समन्वयासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधानांनी, माझ्यासाठी देशाचे हितच सर्वकाही आहे, त्यामुळे ७० वर्षांत जे काम झाले नाही ते १० आठवड्यांत केले. कलम ३७०, ३५ए रद्द केल्याने जम्मू-काश्मीरचे भाग्य बदलणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. एक देश, एक संविधान लागू केल्यानंतर आता एक देश, एक निवडणूक अंमलात आणण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ -
लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' नेमण्याची मागणी १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धापासून करण्यात येत होती. मोदी सरकारने ७३ व्या स्वातंत्र्यदिनी ती मागणी पूर्ण केली आहे. तीनही दलांच्या प्रमुखांवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे नियंत्रण असणार आहे.

कुटुंब नियोजन -
कुटुंब नियोजन करणे म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणे आहे, छोेटे कुटुंब असणे हीसुद्धा एक प्रकारची देशभक्तीच आहे. लोकसंख्येची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करायला हवेत. तसेच ज्या लोकांची कुटुंबे छोटी आहेत त्यांचा सन्मान करायला हवा. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या आहे. पायाभूत सोयीसुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशातील एका वर्गाला या समस्येची जाणीवही आहे. त्यामुळे मुलांच्या जन्मावेळी ते नीट विचार करतात. सर्वांनीच यावर गांभीर्याने विचार करावा, असेदेखील मोदींनी सांगितले.

पाकिस्तानवर साधला निशाणा -
भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानवर मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जगात सध्या असुरक्षेचे वातावरण आहे. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागावर चिंतेचे सावट आहे. काही भागातून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. मात्र भारत अशा शक्तींविरोधात ठामपणे उभा आहे आणि यापुढेही राहील, असा निर्धार व्यक्त करत मोदी म्हणाले की, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा खरा चेहरा आम्ही जगासमोर आणू. दहशतवाद्यांचा खात्माही करू. काहींनी केवळ भारतालाच नव्हे, तर बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंकेसारख्या देशांतही दहशतवाद पसरवला आहे. या परिस्थितीत भारत शांत राहू शकत नाही. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे काम भारत सुरूच ठेवेल, अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला ठणकावले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom