Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असे सांगत जनतेची दिशाभूल करू नये - देवेंद्र फडणवीस


नागपूर: राज्याची आर्थिक स्थिती मागील सरकारच्या काळात बिघडली असल्याचा कांगावा करीत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये कारण राज्याची आर्थिक उत्तम असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात सिद्ध झाले आहे असे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावर चर्चा करतांना म्हणाले.

या ठरावावर बोलतांना विरोधी पक्षनेते म्हणाले की राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही, असे सांगून 'कव्हर फायरिंग'चा प्रयत्न होतो आहे परंतु हे निर्णय जेव्हा घेतले गेले तेव्हा या सर्व निर्णयात शिवसेना सोबत होती. आता ते चूक होते, हे शिवसेनेकडून वदवून घेण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी करणार आहे. प्रत्यक्षात राज्याची आर्थिक स्थिती सर्व निकषांमध्ये पूर्वीपेक्षा उत्तम असल्याचे राज्याचा आर्थिक पाहणी अहवालात सिद्ध झाले आहे. आमच्या शासनाने कर्ज घेतले आणि ते विकासासाठी वापरले आणि तसे करतांना राज्याची आर्थिक घडी विस्कळीत होणार नाही. याचीही काळजी घेतली.

परंतु आता सरकारने या कर्जाचा कांगावा करत ग्रामविकास आणि नगरविकासाच्या कामांना स्थगिती देण्याचा लावलेला सपाटा यामुळे त्यांची ‘स्थगिती सरकार’ अशी प्रतिमा जनमानसात निर्माण होते आहे, अशी प्रतिमा निर्माण होणं धोकादायक असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

अभिभाषणावर आपले मत व्यक्त करताना फडणवीस पुढे म्हणाले की, अतिशय संक्षिप्त अभिभाषण आहे आणि भविष्यात सरकारची कार्यशैली कशी असणार हे या अभिभाषणातुन दिसून येते. सर्वाधिक जागा आम्हाला मिळून आणि जनादेश आमच्या बाजूने असूनही केवळ राजकीय स्वार्थ महत्वाचा झाल्याने आज भिन्न विचारधारेच्या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार बनवले आहे परंतु हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही.

असे असले तरीही, आम्ही आमच्या विचारधारेला अनुसरून कुठेही असलो तरी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवताच्या ठिकाणीच राहतील, बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीने करण्याचा दिला होता काय? शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करू नये असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आश्वासनं स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात. आमच्या काळजीवाहू सरकारने 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले होते याची आठवण त्यांनी पुन्हा एकदा करून दिली तसेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत दिली पाहिजे, 25,000 रुपये हेक्टरी मदत हा त्यांचा शब्द आहे, तो त्यांनी पाळावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी बोलतांना केली.

संविधानाच्या तरतुदीनुसार किमान 12 मंत्री आवश्यक असतात परंतु सध्या फक्त सहा मंत्र्यांवर सरकार चालविले जात आहे परंतु आम्ही त्यालाही आक्षेप घेतला नाही कारण शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होऊ नये असा आमचा हेतू होता परंतू शेतकऱ्यांना ही मदत मिळतांना दिसत नाही.

आमच्या सरकारच्या काळात सूक्ष्म , लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात 59 लाख रोजगार गेल्या 5 वर्षात निर्माण झाले, जे देशात सर्वाधिक आहेत. सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. याशिवाय मुंबईतील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची तसेच समृद्धी महामार्गाची कामे सुरू झाली. एवढेच नाही तर मराठा आरक्षण देण्याचे काम केले तसेच धनगर समाजाला न्याय देण्याचे काम केले आणि त्यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, त्याला कृपया स्थगिती देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी यावेळी बोलतांना केली.

या सरकारमध्ये' त्रिशंकू'चा नवीन अर्थ समजला असे सांगत त्रिशंकू म्हणजे तीन पक्ष एकमेकांवर शंका घेणारे असे सरकार अशी व्याख्या करत त्यांनी या अवस्थेचे उत्तम वर्णन ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या भारुडात केले आहे असे सांगितले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा वीर सावरकर यांच्या तत्वाविरोधात आहे, असे म्हणणाऱ्यांनी वीर सावरकर यांचे 'मोपल्याचे बंड' हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे ,अशी सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना केली. आपल्या खुमासदार शैलीत त्यांनी

कुछ पन्ने क्या फटे
ज़िंदगी की किताब के
जमाने ने समझा
दौर हमारा खतम हो गया।

असा शेर सभागृहाला ऐकवत भाषणाची सांगता केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom