अर्णव गोस्वामींना 20 लाखाचा दंड
December 23, 2020
0
मुंबई: रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. गोस्वामी यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी UK मधील कम्युनिकेशन नियामक कार्यालय (UK’s broadcasting regulator)कडून 20 हजार पौंड म्हणजे जवळपास 19 लाख 73 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क (Worldview media network limited)ला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कंपनी UK मधील रिपब्लिक भारतची जबाबदारी सांभाळते. 6 डिसेंबर रोजी रिपब्लिक भारतच्या ‘पूंछता है भारत’ हा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात पाकिस्तानी नागरिकांबद्दल द्वेषयुक्त आणि भडकवणाऱ्या भाषेचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचा ठपका ठेवत वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्कला दंड ठोठावण्यात आला आहे.
कम्युनीकेशन नियामक कार्यालयाकडून कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘ऑफकॉम’कडून चॅनेलला स्पष्टीकरण देण्याचे आणि पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत. अर्वण गोस्वामी यांनी आपल्या चर्चासत्रात भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेबाबत घेतलेल्या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानच्या अवकाश तसंच तांत्रिक विकासाची तुलना केली होती. तसंच पाकिस्तानकडून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचाही त्यात उल्लेख होता, अशी माहितीही ‘ऑफकॉम’ने दिली आहे.
अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या चर्चासत्रात स्वत: गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांनी केलेली वक्तव्य आणि वापरलेली भाषा ही पाकिस्तानी लोकांविरुद्ध द्वेष निर्माण करणारी होती. त्यात सातत्यानं पाकिस्तानी नागरिकांचा दहशतवादी, माकड, भिकारी, चोर असा करण्यात आल्याचंही ‘ऑफकॉन’ने सांगितलं आहे.