जल देयकांसाठी अभय योजना - ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ
December 31, 2020
0
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थकित जलदेयकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी प्रलंबित जल देयकांचे अधिदान लवकरच करावेत, असे आवाहन मुंबई मनपाच्या जल विभागाने केले आहे.
मुंबईला प्रतिदिन सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. सर्वात शुध्द पाणी पुरवठा करणारी महापालिका म्हणून मुंबई मनपचा देशभरात लौकीक आहे. सुव्यस्थित पाणीपुरवठा नियमितपणे व्हावा, याकरिता नागरिकांकडून त्यांच्या जल देयकांचे अधिदान घेतले जाते. एका महिन्यात ही देयके अदा करणे बंधनकारक आहे. महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त दोन टक्के आकारणी केली येते. आता या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना सूट देण्यासाठी ‘अभय योजना पालिकेने सुरु केली. नागरिकांकडून योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका जलविभागाने दिली. जल-जोडणी ग्राहकांनी प्रलंबित जल देयकातील जलआकार, मलनिःसारण आकार आणि जलमापक भाडे नियोजित वेळेत भरावेत. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (जलकामे) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.