मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा
June 09, 2021
0
मुंबई - मुंबईला मुसळधार पावसाने झाेडपून काढले. सखल भागात पाणी भरल्याने मुंबईतीचे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी पालिका मुख्यालयातील आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
पहिल्याच पावसात नागरिकांचे हाल झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. यावरुन मुंबईत राजकारण चांगलेच तापले. पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेवर भाजपकडून आरोप होत आहेत. हवामान विभागानेही आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट घोषीत केला आहे. पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी मुंबईत पाणी साचलेल्या भागांची माहिती घेतली आणि प्रशासनाला पाण्याचा निचरा तातडीने कसा करता येईल याबाबतच्या सूचना दिल्या. त्यांनी मुंबईत सध्या कोणकोणत्या परिसरात पाणी साचले आहे याची माहिती घेतली. तुंबलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करा, विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेला पूर्ववत करा, रुग्णवाहिकाना अडथळा येऊ देऊ नये, नागरिकांना मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यानी यंत्रणांना दिल्या.
महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांना पालिकेकडून केल्या गेलेल्या कामांची आणि पाहणीची माहिती दिली. इक्बाल सिंह चहल यांनी नुकतंच हिंदमाता येथे थेट रस्त्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी ते आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचले.