Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई - मुंबई आणि लाटा यांचा कायमचा संबंध आहे. एक लाट ओसरली की दुस-या लाटेची तयारी करावी लागते. कोविडच्या संसर्गाच्या दुस-या लाटेदरम्यान वैद्यकीय प्राणवायू उपलब्धतेसाठी आपण सर्वांनी युद्ध लढल्याप्रमाणे स्थिती अनुभवली आहे. त्यामुळे अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी महापालकेने प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली आहे. पालिकेची होत असलेली ही वाटचाल अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. 

महापालिकेने मुंबईत पाच ठिकाणी उभारलेल्या प्राणवायू प्रकल्पाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केले, त्यावेळी ते बोलत होते.महानगरपालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय, विलेपार्लेतील डॉ. कूपर रुग्णालय आणि वरळीतील नेहरु विज्ञान केंद्र येथील कोविड आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी पालिकेने प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारले आहेत. यातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणार आहे. ऑनलाईन झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण, मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी सहभागी झाले होते.

वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणा-या (पीएसए) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या पाच रुग्णालयात सदर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण बोलण्यापेक्षा आपले काम बोलले पाहिजे. महानगरपालिकेने कोविड व्यवस्थापनात केलेल्या कामगिरीचे ‘धारावी मॉडेल’ जसे जगभरात नावाजले गेले, त्याचप्रमाणे प्राणवायू व्यवस्थापनाचे ‘मुंबई मॉडेल’ देखील संपूर्ण जगभरामध्ये कौतुकास पात्र ठरले आहे. त्यासाठीचे श्रेय माझे नसून त्यामागे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह संपूर्ण प्रशासन, सर्व डॉक्टर्स व नर्सेसची मेहनत आहे. ऑक्सिजन साठा उपलब्ध नसल्याने अख्खी रात्र जागून प्रशासनाने सुमारे १७० रुग्णांना स्थलांतरीत केले होते, तो काळ सर्वांच्या स्मरणात आहे. अक्षरशः धडकी भरवणाऱया त्या स्थितीत युद्ध लढल्याप्रमाणे प्रशासनाने काम करुन सर्व रुग्णांना सुरक्षित ठेवले. इतकेच नाही तर, कोविडच्या संपूर्ण दुस-या लाटेदरम्यान एकही रुग्ण प्राणवायू अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, २००५ च्या प्रलंयकारी पुरानंतरचा अनुभव पाहता, लेप्टो संसर्गाच्या निदान व चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात मॉलिक्युलर लॅब २००७ मध्ये उभारली गेली. आता वैद्यकीय प्राणवायूचे महत्त्व लक्षात घेता त्याबाबतीत बृहन्मुंबई महानगरपालिका स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे नमूद करतानाच स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य देणारे डॉक्टर्स, नर्सेस हे देवदुतांपेक्षा कमी नाहीत, असे कौतुकही ठाकरे यांनी केले.

पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविडच्या दुस-या लाटेवेळी प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली. असे असतानाही मुंबईत एकही रुग्ण प्राणवायू अभावी दगावला नाही. त्यामागे सर्वांची अथक मेहनत आहे. प्रशासनाला मदत म्हणून अनेकांनी पीपीई किटपासून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दान स्वरुपात दिले. मेडिकल ऑक्सिजनची गरज पाहता, विचारणा केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये ७ दात्यांनी मिळून जवळपास ८ कोटींची मदत ऑक्सिजन प्लांटच्या रुपाने मान्य केली. थेट उत्पादकांशी बोलणी करुन हे प्रकल्प पुरवले गेले आहेत. यामुळे अत्यंत कमी कालावधीत सदर प्रकल्प उभारुन आज लोकार्पण करणे शक्य झाले आहे. असे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom