Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पुढील दोन महिने महाराष्ट्रासाठी धोक्याचे, कोरोना रुग्ण वाढणार


मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. बऱ्याच जिल्ह्यांत दैनंदिन रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी झाले, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. पुढील दोन महिन्यात अनेक धार्मिक सण येत आहेत. यादरम्यान रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचे मत राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ञांनी मांडले. कोरोनामुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले.

याविषयी, कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, सध्या राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण जास्त असून निदानाचे प्रमाण कमी आहे. कोरोना संसर्ग कमी होतोय, हे खरे आहे. मात्र कोरोना गेलेला नाही हे सामान्यांनी लक्षात घ्यायला हवे. पुढील दोन महिन्यांचा काळ हा संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, महत्त्वाचे म्हणजे बरेच सण-उत्सव आहेत. राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांचे परिणाम पुढील दोन आठवड्यांत लक्षात येतील. यापूर्वीही, निर्बंध शिथिलतेनंतर नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संसर्ग वाढल्याचे आपण पाहिलेले आहे, हा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात अधिक सतर्कपणे वागले पाहिजे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडत आहेत. पर्यटनाचे प्रमाणही मागील महिन्यांच्या तुलनेत वाढले आहे. परंतु, या सगळ्यात संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन केले पाहिजे. सध्या अनेक जण मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. हा प्रकार स्वत:च्या आरोग्यासह इतरांसाठीही तितकाच धोकादायक आहे, असे टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom