
मुंबई - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आता वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या संख्येने लसीकरण केले जाते आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढते आहे. सद्या कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. पुढील एक - दीड महिना खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी थेट लोकांच्या संपर्कात येणारे फेरीवाले, दुकानदार, ऑटो आणि टॅक्सी चालक आदी सुपरस्प्रेडर नागरिकांच्या लसीकरणावर पालिकेने भर दिला आहे. रोज ५०० जणांचे लसीकरण करण्याचे उदिष्ट्य़े पालिकेने ठेवले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात गर्दी होते आहे. सणासुदीत होणा-य़ा गाठीभेटी, बाजारात वाढलेली गर्दी यामुळे पुढील एक - दीड महिना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. यामध्ये फेरीवाले, दुकानदार, ऑटो आणि टॅक्सी चालक आदी सुपरस्प्रेडर यांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी नियोजन केले आहे. फेरीवाले, दुकानदार, भाजीवाला, हॉटेल वेटर, कर्मचारी, डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हर यांचे लसीकरण केले जाणार आहे. खाजगी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या गटांच्या लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. सध्या जीविका हेल्थ केअरच्या माध्यमातून दररोज १०० हून अधिक रस्त्यावर विक्रेत्यांना लसीकरण करण्यात येत आहे. ही संख्या वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. लोकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या गटातील रोज ५०० लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.