एस टी च्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईच्या आझाद मैदानात संप सुरु आहे. आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन संवाद साधत रिपब्लिकन पक्षाचा एसटी कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत; रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड; चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे; जिल्हा अध्यक्ष संजय पवार; शिरीष चिखलकर आदी उपस्थित होते.
यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यमय शैलित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी मविआ सरकारला इशारा दिला.
ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं म्हटलं आहे. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
जय भीम आहे माझ्या गाठीशी,
मी तुमच्या आहे पाठिशी,
सरकारला सळो की पळो करुन सोडा असं आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केलं. हे महाविकास आघाडी सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झालं असतं, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.