मुंबई - एखाद्याला खोटा फोन आला, पैसे अकाउंटमधून कमी झाल्याचा संदेश आल्यास त्यांनी त्वरित सायबर क्राईम विभागाला माहिती द्यावी. अशी माहिती त्वरित दिल्यास दोषींना पकडणे शक्य असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती वेळेवर दिल्याने नागरिकांचे ६ कोटी रुपये आम्ही वाचवू शकलो असे नगराळे यांनी सांगितले. (If the cyber crimes are reported to the police immediately, the culprits can be caught)
मुंबई पोलिसांच्या २०२१ या वर्षाचा वार्षिक अहवालाचे प्रकाशन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नागराळे यांनी हे आवाहन केले आहे. एखादा सायबर गुन्हा घडला, एखाद्याचे अकाउंटमधील पैसे कोणी काढून घेतल्यास एक तास हा गोल्डन हावर असतो. या एका तासात पैसे संबंधित गुन्हा करणाऱ्याच्या अकाउंटमध्ये असतात. त्याचवेळी तक्रार आल्यास बँकाही सहकार्य करून ते पैसे इतर अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करू देत नाहीत. यामुळे दोषींवर कारवाई करणे शक्य होते. यासाठी असे गुन्हे झाल्यास नागरिकांनी त्वरित सायबर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नगराळे यांनी केले.
लवकरच पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही -
पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावण्यास सांगितले आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी टेंडर काढले आहे. हे टेंडर अंतिम टप्प्यात आहे. काही पोलीस ठाण्यात खासगी सहभागाने सीसीटीव्ही लावले आहेत. मुंबईत महत्वाच्या रस्त्यावर 5380 सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे गुन्ह्याचा शोध घेण्यात त्याचा उपयोग होत आहे. मुंबईत केबल टाकण्याचे काम सुरु असून आणखी 5530 सीसीटीव्ही लवकरच लावू असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबईमधील विकासकामांमुळे ट्रॅफिक -
मुंबईत काल राजकीय आंदोलन झाले यामुळे ट्रॅफिक जाम झाले. राजकीय आंदोलनामुळे ट्रॅफिक होते का यावर बोलताना, मुंबईमध्ये जास्त वाहने असल्याने ट्रॅफिक जाम होते. शहरात रोड, पूल आणि मेट्रोचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यावर ताण येणे साहजिक आहे. नागरिकांना त्रास होतोय याची जाणीव आहे. लोक जास्त रस्त्यावर आल्यावर गर्दी होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामधून आम्ही मार्ग काढत आहोत. मात्र कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते असे नगराळे म्हणाले.
महिला घराबाहेर न आल्याने गुन्हे कमी -
२०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने कर्फ्यू लागू होता. यामुळे महिला घराबाहेर आल्या नाहीत. यामुळे केसेस कमी झाल्या. याला आणखीही कारणे असू शकतात असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. महिला व बालकांच्याबाबत गुन्हा दाखल केल्यावर महिला अधिकाऱ्यांकडे तपास दिला जातो. अशा केसेसकडे विशेष लक्ष दिले जाते. वरिष्ठ अधिकारी याचा रोज आढावा घेतात. असे गुन्हे करणाऱ्या क्रिमिनल रेकॉर्ड बनवले आहेत. अशा लोकांना तडीपार केले जातेय. प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया सहायता केंद्र सुरु केले जात आहे. पीडितांचे काऊन्सिलिंग केले जाणार आहे. स्लम, लेडीज हॉस्टेल ज्या ठिकाणी महिला अधिक प्रमाणात असतात ती ठिकाणे मॅपिंग केली आहेत. निर्भया पथक त्याठिकाणी जाऊन पेट्रोलिंग केले जात आहे असेही आयुक्तांनी सांगितले.
आर्थिक गुन्ह्यातील ४० कोटी मिळवून दिले -
आर्थिक गुन्ह्यांमध्ये गुन्हयाचा शोध लावणे, आरोपीला शोधणे, ज्याचे नुकसान झाले त्याला त्याची रक्कम कशी मिळेल यासाठी आरोपीकडे बँकेट किती रक्कम आहे, प्रॉपर्टी किती त्याचा आढावा घेतला जातो. त्याची माहिती घेऊन आरोपीला अटक केली जाते. तक्रारदाराला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. 2021 मध्ये पीडितांना 40 कोटी रुपये मिळवून देण्यात पोलिसांना यश आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गॅंगस्टरबाबात तक्रारींची दखल -
दाऊदबाबत सीबीआय तपास करत आहे. इडीने दाऊदच्या काही निकटवर्ती आणि हस्तकांची मालमत्ता सिल केली आहे. मुंबई पोलीस यावर लक्ष ठेवून आहे. गँगस्टरबाबत कोणतीही तक्रार आल्यावर गुन्हा नोंद करून कारवाई केली जाते. मुंबईत नोंद झालेल्या केसेसमध्ये या तक्रारींचीही नोंद आहे असे नागराळे म्हणाले.