मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. लता दिदींचे हे स्मृतीस्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागेवरती पार्कात लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारावे आणि त्यांच्या स्मृती कायमस्वरुपात जतन कराव्यात. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने मी ही विनंती करत असल्याचे, राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.