मुंबई दि.9 - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून ते अनेक मुद्द्यांवरुन गाजताना दिसत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं पेन ड्राईव्ह प्रकरण चर्चेत आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप जोर धरुन आहे. तसंच आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे विधीमंडळात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आज विधानभवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर; माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किसन कथोरे आदींनी आठवले यांची विधान भवनात स्वागतपर भेट घेतली. आठवले यांनी आपल्या खास काव्यमय शैलीत म्हटलं आहे की, आज माझा विधीमंडळात होता फेर फटका, कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका..
पुढे ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तुरुंगात असून कुणी मंत्री राहू शकत नाही. ते तुरुगांत असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, ही महाविकास आघाडीची भूमिका अत्यंत चुकीची आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्यांना न्याय मिळाला आहे. मोदी हे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे बाकी राज्यातही भाजपचेच सरकार सत्तेमध्ये येईल. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी या निवडणुकीत राहणार आहे. महापालिकांमध्येही या वर्षी भाजप सत्तेत येईल.