
मुंबई - राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे बढतीमधील आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकरप्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असमर्थता दाखवली आहे. त्यांनी, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत अनौपचारिक चर्चा करून बैठकीची पुढील तारीख निश्चित कंरण्यात येईल. असे आरक्षण हक्क कृती समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
आरक्षण हक्क समितीचे शिष्टमंडळ आज बुधवारी मंत्रालयात अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. या शिष्टमंडळात माजी खासदार हरिभाऊ राठोड, डॉ संजय कांबळे - बापेरकर, एस. के. भंडारे, अनिल गाडे, अनिल निरभवणे आत्माराम पाखरे, सिद्धार्थ कांबळे, दीपक मोरे हे कोअर कमिटीचे सदस्य होते. केंद्र सरकारने १२/४/२०२२ रोजी बढती मधील आरक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा बढती मधील आरक्षण सुरू करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर बोलताना अजित पवार यांनी आमचे तीन पक्षाचे सरकार असल्याने मला एकट्याला निर्णय घेता येणार नाही असे सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व मुख्यमंत्र्यांशी अनौचारिक चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
यावेळी बढती मधील आरक्षणाबाबत शासनाने निर्णय न घेतल्यास येणाऱ्या १ मे २०२२ "कामगार तथा महाराष्ट्र दिनी" "एल्गार मोर्चा"चे आयोजन मुंबई येथील आझाद मैदान येथे करण्यात येईल असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे.