मुंबई - जनतेची दैन्यावस्था करणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध डाव्या पक्षांनी २५-३१ मे दरम्यान देशव्यापी आंदोलन (left parties andolan) पुकारले आहे. हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करावे, अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे.

दि. २३ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले-लिबरेशन) यांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

२५-३१ मे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांवर जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

बैठकीस 'माकप'चे डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. एस. के. रेगे; 'भाकप'चे तुकाराम भस्मे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, सुभाष लांडे; 'शेकाप' चे राजू कोरडे; 'लानिप'चे भीमराव बनसोड, राजेंद्र बावके; आणि भाकप (माले) 'लिबरेशन'चे श्याम गोहिल व अजित पाटील उपस्थित होते.

या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, इत्यादीही सहभागी होत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post