Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कुर्ला येथील तीन मजली इमारतीचा भाग कोसळून १९ जणांचा मृत्यू



मुंबई - कुर्ला, नाईक नगर सोसायटीतील जुन्या धोकादायक चार इमारतींतील एक तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून त्यात १९ जणांचा मृत्यू झाला. ४ जणांवर उपचार सुरु असून १० जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ही इमारत ४९ वर्ष जुनी असून ती धोकादायक स्थितीत होती. दरम्यान या प्रकरणी ऑडिटरची चौकशी करून करावी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत पावसाळा अद्याप जोर धरला नसताना पडझढ मात्र सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील घर कोसळून एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर कुर्ल्यातील या इमारतीचा भाग पत्त्याच्य़ा बंगल्याप्रमाणे कोसळला. पूर्वेकडील एस. टी. डेपोजवळ, नाईक नगर सोसायटी येथे जिल्हाधिकारी जमिनीवर १९७३ साली उभ्या राहिलेल्य़ा चार इमारती आहेत. यातील तीन मजली असलेली ही इमारत पालिकेने २०१६ साली धोकादायक असल्याचे जाहिर केले होते. त्यावेळी इमारतीचा पाणी पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात करण्यात आले. यावेळी या इमारतीची दुरुस्ती केल्यास राहता येऊ शकते, असा अहवाल देण्यात आला. अहवालानंतर खंडीत केलेला पाणी, वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. त्यानंतर या इमारतीत घराचे मालक राहत नव्हते. मात्र भाड्याने राहण्यासासाठी काहीजण आले. यात बलिया कुटुंबातील तीघे व काही मजूर भाडेकरू राहत होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास या तीन मजली इमारतीचा एक भाग खचला आणि काही क्षणातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळला. रात्रीची वेळ व त्यात रिपरिप पडणा-या पावसात या इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने जोरात आवाज झाला. बाजूच्या इमारतीतील रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. ढिगा-यात काही जण दबल्याचे तर काही इमारतीच्या धोकादायक भागातच अडकल्याचे लक्षात आल्यावर बाजूच्या रहिवाशांनी आरडा ओरडा करीत धावपळ केली. रात्रीची वेळ असल्याने बाजूच्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरु केले. घटनेची भीषणता पाहता पावसाळ्यातील दुर्घटनात मदतीसाठी अगोदरच सुसज्ज ठेवण्यात आलेल्या 'एनडीआरएफ' पथकाला अधिकच्या मदतीसाठी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, २ रेस्क्यू व्हॅन, जवान, अधिकारी, 'एनडीआरएफ' पथक, पालिकेचे कनिष्ठ अभियंते, मुकादम, २८ कामगार, ५ जेसीबी, १ लॉरी आदींच्या साहाय्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले. अग्निशमन दल, एनडीआरएफच्या जवानांना अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र यात ढिगा-याखाली अडकलेल्या १९ जणांना जीव गमवावा लागला. जखमींना राजावाडी व सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर यातील १० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.



राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयाची मदत -
कुर्ल्यातल्या इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यसरकारने ५ लाख रुपयाची आर्थिक मदत आणि जखमींवर मोफत उपचार करण्याचे जाहिर केले. मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबतची घोषणा केली. ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत, अशा धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी पालिकेने नोटिस बजावल्यावर इमारत तात्काळ रिकामी करणे आवश्यक आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी रहिवाशांना आवाहन केले आहे.

ऑडिटरवर कारवाई होणार -
कुर्ला नेहरू नगर येथील नाईक नगर सोसायटीमधील ४ इमारती १९७३ मध्ये बांधण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये या इमारतींना धोकादायक जाहीर करण्यात आले. इमारतीचे वीज आणि पाणी कापण्यात आले होते. मात्र सोसायटीने इमारत दुरुस्त करता येऊ शकते असा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केला. यामुळे या इमारतीला धोकादायक यादीमधून वगळण्यात आले होते. ही इमारत कोसळल्याने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणाऱ्या ऑडिटरची चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांची दोनवेळा घटनास्थळी भेट-
कुर्ल्यातील इमारत कोसळल्याची माहिती समजताच पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री दोन वाजता दुपारी तीन वाजता असे दोनवेळा घटनास्थळी भेट दिली. घटनेची भीषणता लक्षात घेऊन संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधून मदत व बचावकार्याला वेग आणण्याच्यादृष्टीने सूचना दिल्या. अग्निशमन दल व एनडीआरएफच्या जवानांकडून रात्र व दिवसभर बचावकार्य सुरू होते. मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्रतपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी स्वीकारून लवकरात लवकर अशा धोकादायक इमारती खाली कराव्यात. त्यामुळे, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणे मदतीचे ठरेल, असे आदित्य ठाकरे यांनी यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom