
मुंबई - भाजपकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्लॅन केला जात असून मुंबईत कदाचित दंगल घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर केला आहे. रत्नागिरीतील गुवागर येथे झालेल्या शिवसेनेच्या एका सभेत बोलतताना हा आरोप केला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यासाठी सर्वांनीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीनंतर या निवडणुकाला मुहूर्त मिळणार असल्याचे बोलले जाते आहे. यासाठी भाजपने मोठे प्लॅनिंग केले असून महापालिका जिंकण्यासाठी त्यांच्याकडू दंगल घडवली जाऊ शकते असा आरोप जाधवांकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर नारायण राणे आणि शिंदे गटात गेलेल्या रामदास कदम यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटाला निशाणा केला आहे. तर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर बोचरी टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार फोडले आहेत.
त्यानंतर शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी आणि पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रात सभा आणि दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाप्रबोधन यात्रा तर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेचे आयोजन करत महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या असून भास्कर जाधव यांनी भाजपवर केलेल्या आरोपावर भाजपकडून काय उत्तर येणार याकडे लक्ष लागलेले आहे.