Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

९ ऑगस्ट पासून मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलाव क्षेत्रात जुलै २०२३ मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली १० टक्के पाणी कपात बुधवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

असे असले तरी, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे विनम्र आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom