मुंबई : शहर आणि उपनगरात निर्माण होणार्या शेकडो टन कचर्याची योग्यरीत्या विल्हेवाट तसेच कचरा उचलणार्या वाहनांच्या वाहतुकीवर आता जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. 'जी' दक्षिण विभागात महापौर स्नेहल आंबेकर, आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली.
मुंबई मनपातर्फे रहिवाशांना पुरवण्यात येणार्या सुविधांवर ऑनलाइन नजर ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी मनपाने पाऊल उलचण्यास सुरुवात केली असून त्याचाच जीपीएस यंत्रणा एक भाग आहे. वाहनांवर जीपीएस आणि कचरा पेट्यावर रेडिओ फ्रिक्वेन्सी यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'जी' दक्षिण विभागात १९ कचरा वाहून नेणार्या गाड्या, ३ कॉम्पॅक्टर आणि १७६ कचरा पेट्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. येत्या पाच महिन्यात संपूर्ण मुंबईत टप्प्याटप्प्याने जीपीएस यंत्रणा सर्व कचर्या पेट्या, वाहने, कॉम्पॅक्टरवर बसवण्यात येणार आहे. यासाठी जवळपास २१ कोटी रुपये खर्च होणार आहे. रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलांच्या वाहनांवर ही जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या वाहनांची सद्यस्थिती तसेच त्यांचा पुढील मार्ग मोकळा करण्यास यामुळे सहकार्य लाभणार आहे.
