मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमधील बिल्डरांकडून सुरु असलेल्या विकासाच्या कामाकडे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चांदिवली येथील इमारतीप्रमाणे दुर्घटना घडत आहेत. अश्या दुर्घटनांकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांचे आणि कामगारांचे जीव जात आहेत. याला जबाबदार असलेल्या पालिका अधिकारी आणि आर्किटेकवर कारवाई करावी. विकासक व आर्किटेक यांच्यावर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे सुधार समितीच्या बैठकीत केली आहे.
पालिकेच्या एल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या चांदिवली येथील एका विकासकाने इमारत उभी केली. त्यासाठी
पालिकेकडून परवानगी घेतली. नंतर या विकासकाने हि इमारत एसआरएच्या माध्यमातून विकसतीत करण्याचा निर्णय घेतला. विकासकाने पालिकेला तशी माहिती कळविले असता पालिकेने त्याच्याकडून कागदपत्रांचा तगादा लावल्याने विकासकाने इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. इमारत पाडली जात असताना २६ ऑगस्टला अपघात घडला आणि सात कामगारांचा मृत्यू झाला. पालिकेने या दुर्घटनेनंतर जागेवरील डेब्रिज हटवले. मात्र विकसकाकडून त्याचे शुल्क अद्याप घेतलेले नाही. पालिकेच्या एल विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हि दुर्घटना घडली आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. पालिका अधिकारी विकासकांच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने असे प्रकार घडत असल्याने पालिका अधिकारी व संबंधित आर्किटेकवर कारवाई करावी अशी मागणी आझमी यांनी केली. यावेळी आर्किटेकचे लायसन्स रद्द करावे, एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, पालिकेने किती आर्किटेकवर कारवाई केली किती आर्किटेकना कारणे दाखवा नोटीस बजावली याची माहिती सुधार समितीत सादर करावी अशी मागणी आझमी यांनी केली.