मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. मात्र तरीही अनेक कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावताना अनेक अडचणी येत आहेत. बायोमेट्रिक हजेरी न लावणाऱ्या 2 हजार 200 कर्मचा-यांचे वेतन पालिकेने रोखले आहे. दरम्यान नियमावर बोट ठेऊन पालिकेने कर्मचाऱ्यांचा पगार रोखला असल्याने त्यांना घरखर्च चालवणे कठीण झाले आहे. कर्मचा-यांना वेळेवर वेतन न मिळाल्य़ाने अनेकांचे घराचे कर्जाचे हप्तेही रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी पालिकेत बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यात आली आहे. जे कर्मचारी सिस्टिमनुसार हजेरी लावणार नाहीत, अशांचा पगार रोखला जातो आहे. मात्र काहींना सरकारी काम दिल्याने हजेरी लावता आलेली नाही, तर काहींनी हजेरी लावूनही त्यांची हजेरी लागलेली नाही व काही दिव्यांग कर्मचारी असल्याने त्यांना बायोमेट्रिक हजेरी लावणे शक्य झालेले नाही. याचा फटका पालिका कर्मचाऱ्यांना बसला आहे. दर महिन्याला मिळणारा पगार वेळेत का मिळाला नाही, म्हणून कर्मचा-यांनी चौकशी केली असता बायोमेट्रिक हजेरीनुसार सिस्टिमध्ये थंब न झाल्याने तब्बल 2 हजार 200 कर्मचा-यांचे पालिकेने काढले नसल्याचे समोर आले. मात्र या कर्मचा-यांमध्ये अनेक कर्मचारी सरकारी कामकाजावर असल्याने त्या वेळेत त्यांना हजेरी लावता आलेली नाही. तर काही कर्मचारी दिव्यांग असल्याने हजेरी लावता आलेली नाही. मात्र विनंती केल्यानंतर अशा कर्मचा-यांना वेतन देण्य़ाची तयारी प्रशासनाने दाखवली, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अजूनही त्यांना पगार मिळाला नसल्याची माहिती काही कर्मचा-यांनी सांगितले. दरम्यान य़ातील अनेक कर्मचा-यांनी बायोमेट्रिक हजेरी लावली असतानाही त्यांची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे बायोमेट्रिक यंत्रणेमध्य़े काही चुका आहे, की योग्य प्रकारे कर्मचा-यांना हजरी लावता आलेली नाही, याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र या कारणामुळे काहींना दोन ते तीन महिने पगार मिळाला नसल्याने अनेकांना घर चालवणे कठीण झाल्य़ाचे काही कर्मचा-यांनी सांगितले.