मुंबई । प्रतिनिधी - एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर तीन पुलांचे बांधकाम भारतीय सैन्य दलाकडून करण्यात येत आहे. त्यापैकी एल्फिस्टन पुलाचं काम पूर्ण झालं आहे. या पुलाच्या वापराबाबत अद्याप पश्चिम रेल्वे आणि भारतीय सैन्य दलाकडून कोणतीही अधिकृत घोषणा केली नसताना प्रवाशांकडून मात्र या पुलाचा वापर सुरु करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या एल्फिस्टन रोड स्थानकातील पुलावर २९ सप्टेंबरला सकाळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अफवा पसरल्याने प्रवाशांनी पळापळ केली त्यातच पुल अरुंद असल्याने हि दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पुलासह, मध्य रेल्वेवरील करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पुलाचं काम ३१ जानेवारी पर्यंत भारतीय सैन्य दलाकडून करुन घ्यायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या पुलांच्या बांधणीला ५ नोव्हेंबरपासून सुरूवात करण्यात आली. या तीन पुलांपैकी एल्फिन्स्टन पुलाचं काम पूर्ण झालं आहे. या पुलाच्या वापराबाबतची घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून किंवा भारतीय सैन्य दलाकडून झाली नसली, तरी या पुलाचा वापर प्रवासी करताना दिसून येत आहेत. हा पूल १ जानेवारीपासून प्रवासी वापरत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पुलाच्या वापराबाबत अधिकृत घोषणा न होताच प्रवासी पुलाचा वापर करत असल्याने याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.