आजारपणाचा खर्च कंपनी किंवा पालिकेने द्यावा -
मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करण्यात आली होती. ही योजना 31 जुलैपासून बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना आजारपणावर केलेला खर्च परत मिळत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असल्याने आजारपणावर केलेला खर्च विमा कंपनी किंवा पालिकेने परत करावा तसेच विमा योजना सुरू करावी अशी मागणी नगरसेविका प्रज्ञा भुतकर यांनी महापौरांकडे केली आहे. या मागणीबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. येत्या गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून गटविमा योजना लागू केलेली होती. त्या गटविमा योजने अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच मिळाले. आजारपणावर होणाऱ्या खर्चाचा भार कर्मचाऱ्यांवर पडू नये म्हणून त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापून ही योजना राबविण्यात आली. परंतू विमा कंपन्यासोबतचा वार्षिक करार 31 जुलै 2017 ला संपुष्टात आला. हा करार पुढील कालावधीसाठी झाला नसल्याने ऑगस्ट पासून हजारो कर्मचाऱ्यांना आजारपणावर भरमसाठ खर्च करावा लागला आहे. हा खर्च करार संपल्याने विमा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना देण्यास नकार दिला आहे. करार झालेला नसताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून विम्यासाठी कपात केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन ऑगस्ट नंतर पालिका कर्मचाऱ्यानी आजारपणावर केलेला 4 लाखा पर्यंतचा खर्च त्यांना विमा कंपनी किंवा महापालिकेने परत करावा तसेच विमा योजना त्वरित सुरू करावी अशी मागणी प्रज्ञा भुतकर यांनी केली आहे. याबाबत येत्या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.