जळगांव - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसला इंग्रजांशी लढा दिला होता. आता देशाचे संविधान वाचवण्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपातन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी करत या लढ्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले. जळगांवच्या गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रांगणात काँग्रेसचे दुसरे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजप सरकारचा गेल्या साडे तीन वर्षाचा काळ म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असा आहे. राज्यातले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर येऊन आत्महत्या करू लागले आहेत. किड्या-मुंग्या प्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला काही देणे-घेणे नाही. राज्यातील आणि देशातील सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्रस्त झालेली जनता आता निवडणुकीची वाट पाहत आहे. येणा-या निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनता भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका केली. मोदी आणि फडणवीसांच्या काळात देशाची आणि राज्याची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली असून उद्योग धंद्यावर मंदीचे सावट पसरले आहे. तसेच बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्राच्या शेती आणि उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसला असून राज्यात गुंतवणुकीचे करार केलेल्या अनेक कंपन्यांनी माघार घेऊन कर्नाटकसारख्या राज्यात गुंतवणूक केली आहे. मेक इन महाराष्ट्र सपशेल अपयशी ठरल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.