मुंबई - २०१३ मधील किनान सॅण्टोस आणि रियुबन फर्नांडिस या तरुणांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि पोलिस खबऱ्याची निर्घृणपणे हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अविनाश सोळंकी ऊर्फ बाली (३८) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. बालीची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली याचा तपास पोलीस करत आहेत. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
अंधेरीतील आंबोलीत ऑक्टोबर २०१३ मध्ये किनान सॅण्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांची हत्या करण्यात आली होती. जितेंद्र राणा, सतीश सुलाह, सुनील बोध आणि दीपक पिवल अशी या चौघांची नावे होती. या चौघांनी किनान सॅण्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांनाही चाकूहल्ला करून ठार केले. या दोघांवरही अनेक वार करण्यात आले होते. गंभीर जखमी असताना दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. किनानचा मृत्यू रुग्णालयात दाखल करतानाच झाला होता, तर रियुबनी मृत्यूची झुंज रुग्णालयात संपुष्टात आली होती. या प्रकरणात अविनाश बाली हा मुख्य साक्षीदार होता. बालीने शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नव्हती. त्याने दिलेल्या साक्षीमुळेच या प्रकरणातल्या चार आरोपींना २०१६ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. अंधेरी पूर्व, महाकाली गुंफा रोड, अपोलो इंडस्ट्रीयल इस्टेट, गाळा नंबर ३४ या ठिकाणी बालीचा मृतदेह आढळला. दोन अज्ञात इसमांनी त्याच्यावर धारदार व बोथट शस्त्राने डोक्यावर, पोटावर, गुप्तांगावर वार करून त्याची हत्या करून पळ काढल्याचे उघड झाले आहे. पहाटे २.४० वाजेच्या दरम्यान या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.