मुंबई - विषाणू, जीवाणू किंवा बुरशीसारख्या परोपजिवींमुळे होणारा सेप्सिस हा असा संसर्ग आहे, ज्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. दरवर्षी जगातील सुमारे २ ते ३ कोटी रुग्ण या संसर्गाने बाधीत होतात, असा अंदाज बांधण्यात आला असून जगात काही सेकंदांमागे कुणीतरी सेप्सिसच्या संसर्गाने मरण पावते, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संसर्गाची तपासणी, निदान झाले नाही आणि त्यावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर त्यामुळे सेप्सिस शॉक, अवयव निकामी होणे आणि मृत्यू ओढवू शकतात. उशिरा निदान हा एक मोठा काळजीचा विषय आहे. कारण सेप्सिसच्या निदानाच्या प्रत्येक तासाच्या विलंबामुळे मृत्यूचा धोका ८ टक्क्यांनी वाढतो. त्याचवेळी २०१७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ५ वर्षांच्या सेप्सिस अभ्यासात एकाच केंद्रातील, रुग्णालयातील, आयसीयूमधील आणि २८ दिवसांमधील मृत्यूदर अनुक्रमे ५६ टक्के, ६३ टक्के आणि ६३ टक्के असल्याचे दिसून आले. नवजात बालके, वृद्ध, कर्करोगबाधित आणि प्रत्यारोपणाचे रुग्ण तसेच एचआयव्हीने बाधित लोकांना सेप्सिसचा धोका जास्त प्रमाणात आढळतो. हा संसर्ग शरीरात वेगाने पसरतो आणि तो तपासला न गेल्यास किंवा त्याचे निदान न झाल्यास आणि त्यावर वेळेत उपचार न झाल्यास सेप्सिस शॉक, अवयव बंद पडणे आणि मृत्यू असे प्रकार घडू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.