बारामती - मनमोहन सिंग सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजीम्याची मागणी करत असत. मात्र मी नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी केली. तसेच पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशाचे संरक्षण करण्यास पंतप्रधान व त्यांच्या सरकारला अपयश आले असल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
बारामती येथील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी पवार पत्रकारांशी बोलत होते. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्व स्तरातून निषेध होत असून ही राजकारण करण्याची वेळ नाही, अशी पुष्टीही पवार यांनी या वेळी जोडली. या वेळी पवार म्हणाले, आपण याच्यावर राजकीय भाष्य करू इच्छित नाही, मात्र नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला दहशतवादी हल्ले थोपवण्यात अपयश आलेले आहे. या हल्ल्यात शेजारच्या देशाने दहशतवाद्यांना मदत केली, हे उघडपणे दिसत आहे. दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आलेली आहेत आणि ते प्रशिक्षित दहशतवादी होते, याचा अर्थ त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, हे उघड आहे. संपूर्ण माहिती देऊन पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला घडवण्यात आल्याचे दिसून येत आहे. सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही. संपूर्ण देश आज शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा असल्याचे पवार म्हणाले.