मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ३४ जण जखमी झाले आहेत. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. ही दुर्घटना घडली त्यावेळी रस्त्यावर ‘रेड सिग्नल’ लागल्याने पुलाखालील वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अंजुमन इस्लाम शाळेजवळ हा ब्रिज आहे. कसाब पूल किंवा कसाब ब्रिज म्हणूनही हा पादचारी पूल ओळखला जातो. सीएसएमटी स्टेशन ते टाईम्स इमारतीची बाजू असा हा ब्रिज जोडतो. या ब्रिजवर नेहमीच वर्दळीची परिस्थिती असते. नेहमीप्रमाणे चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ होती, त्यामुळे या ब्रिजवर साहजिकच गर्दी होती. लोक चालत असताना अचानक भगदाड पडल्याप्रमाणे पूल कोसळला. ज्या पुलावरुन लोक चालत होते, क्षणार्धात पुलावरील लोक खाली कोसळले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. या पुलाखालून जे जे फ्लायओव्हरकडे रस्ता जातो. दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एकच टॅक्सीचालक त्याची गाडी उभी होती. सुदैवाने पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सीचालक बचावला.