Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुसळधार पावसात ४ जणांचा मृत्यू, एक बेपत्ता


मुंबई - मुंबईत गेले तीन दिवस पाऊस पडत होता. मंगळवार रात्रीपासून पावसाने मुंबईला अक्षरशा झोडपून काढले. यामुळे मुंबईची तुंबई झाली. यावेळी मुंबईत तब्बल ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. मृतांमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत सोमवारपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री सुरु झालेला मुसळधार पाऊस बुधवारीही कोसळत होता. मुंबईमध्ये मिठी नदी, पोयसर, दहिसर नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. नालेही पाण्याने दूथडी बहरून वाहत होते. यामुळे मुंबईमधील अनेक सखल भागात पाणी साचले. रस्ते वाहतूक सेवा कोलमडली. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद पडली होती.

त्याचवेळी गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालयाजवळही पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात जगदीश बद्धा परमार व विजयेंद्र सरदार बगडी हे सफाईचे काम करत होते. सिद्धार्थ हॉस्पिटलजवळ जगदीश बद्धा परमार यांचा कर्तव्य बजाविताना दुपारी १२.३० च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्या कपाडिया रुग्णालयात दाखल केले. तर विजयेंद्र सरदार बगडी (वय ३६ वर्षे) हे पाण्यात वाहून जाताना लोकांनी त्यांना बाहेर काढून जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाकडून या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सायंकाळी ४.२० च्या सुमारास वांद्रे कुर्ला कॉम्लेक्स येथील भारत नगर खाडीत युवक खाडीत पडला. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून सायन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याचे नाव मोहम्मद शाहरुख शकिफ शेख असून तो २४ वर्षाचा आहे. मध्यरात्री १२.२५ च्या सुमारास हिंदमाता सेंट पॉल शाळा येथे एक तरंगणारा मृतदेह पोलिसांना आढळला. तो मृतदेह पोलिसांनी केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अशोक दत्ताराम मयेकर असे या मृताचे नाव असून तो ६० वर्षाचा आहे. या दोन्ही घटनांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

एक जण अद्याप बेपत्ता -
मुसळधार पाऊस सुरु असताना सायंकाळी ६.५० च्या दरम्यान कला नगर खाडी, धारावी टी जंक्शन येथे मिठी नदीत चार मुलांनी पोहण्याकरिता उड्या मारल्या. त्यापैकी तीन मुले सुखरूप बाहेर आली. एका मुलाचा शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाने शोध घेऊनही त्या मुलाचा शोध न लागल्याने नौदलाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या मुलाचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom