Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

तर सरकार स्थापनेसाठी भाजप पुढाकार का घेत नाही - संजय राऊत


मुंबई - 'जर जनादेश महायुतीला मिळाला आहे, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजप पुढाकार का घेत नाही?,' असा सवाल राऊत यांनी केला. जरा भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करून दाखवावं, असं आव्हान शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. 

'शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम असतात. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, या भूमिकेवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव यांनी जी भूमिका मांडली होती, त्यात कुठलाही बदल झालेला नाही,' याचा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. 

शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, असं मुनगंटीवार आज म्हणाले, त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. 

२०१४ मध्ये भाजपने अल्पमतातलं सरकार बनवण्याचा प्रयोग केला होता मात्र तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती वेगळी आहे. आता कोणतीही दहशत, धमक्या, ब्लॅकमेलिंग, पोलिसी बळाचा वापर चालणार नाही. हा शिवसेनेचा इशारा आहे. साम दाम दंड भेद ही निती जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंतच चालते. सत्तेचा माज आणि मस्ती उतरली की साम दाम दंड भेदाचे सगळे अलंकार गळून पडतात, असा वारही राऊत यांनी भाजपावर केला.

जनादेश मिळालाय तो केवळ युतीला नव्हे तर युतीसंदर्भात जे-जे धोरण ठरलं आहे, त्या सगळ्याला मिळाला आहे, हे लक्षात घ्यायला हवं,' असं राऊत म्हणाले. 'या राज्यात लवकरात लवकर सरकार निर्माण व्हावं त्या सरकारला ताकद देण्याचं काम शिवसेना करेल,' असंही ते म्हणाले. 'युती तोडण्याचं पाप मी करणार नाही, ही उद्धव यांची भूमिका २४ तारखेपासून आजपर्यंत ठाम आहे,' असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आज दुपारी मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. त्याची माहिती राऊत यांनी दिली. सगळ्या आमदारांनी उद्धव यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, असं त्यांनी सांगितलं.

भारतीय राज्यघटना ही कुणाची जहागिरी नाही -
आमचं सरकार येणार नसेल तर कोणतंही सरकार राज्यात येऊ देणार नाही, अशी भूमिका कुणी घेत असेल तर ते घटनेच्या विरोधात आहे. भारतीय राज्यघटना ही कुणाची जहागिरी नाही, हे ध्यानात ठेवावे. राज्याला राष्ट्रपती राजटवटीकडे ढकललं जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. शिवसेना पर्याय देण्यास समर्थ आहे. घटनेच्या चौकटीत राहून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही बनवू, असे राऊत म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom