Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नाल्यात कुणीही पडल्यास पालिका जबाबदार नाही



मुंबई - अतिवृष्टीच्यावेळी घराजवळील मॅनहोल आणि नाल्याची पाण्याची पातळी वाढली आणि त्यात जर कुणी पडलं तर त्याची जबाबादारी आता पालिकेची राहणार नाही. मुंबई महापालिकेने ही जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवर ढकलली असून आपले हातवर केले आहेत. त्यामुळे मॅनहोल आणि नाल्याच्या शेजारी राहणाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेने गोरेगाव, मालाड, कांदिवली, मालाडसह मुंबईतल्या नाल्याशेजारील परिसरात महापालिकेने आपली जबाबदारी झटकणारे बॅनर्स लावले आहेत. अतिवृष्टी झाल्यास छोट्या-मोठ्या नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन धोका निर्माण होतो. अशावेळी या नाल्यांमध्ये कोणी पडल्यास किंवा निष्काळजीपणामुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला पालिका जबाबदार राहणार नाही. नाल्याच्या परिसरातील नागरिकांनी स्वत:च स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तुमची लहान मुलं आणि दिव्यांगांची तुम्हीच काळजी घ्या, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. पालिकेने नाल्याशी संबंधित कोणत्याही दुर्घटनेला आपण जबाबदार नसल्याचं स्पष्ट केल्याने मॅनहोल आणि नाल्याच्या शेजारी राहणारे रहिवाशी हवालदिल झाले असून महापालिकेवर संताप व्यक्त करत आहेत.

मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र, पाऊस सुरू होताच मुंबईतील विविध भागात पाणी साचल्याने पालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यातच पालिकेने दुर्घटनेची जबाबदारी झटकून टाकल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मुंबईतील नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली असून मुंबईतील अनेक नाल्यांची नालेसफाई झालीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवासंपूर्वी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी नालेसफाईवरून पालिका प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला होता. १२ आणि १३ जून रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील नालेसफाई ११३ टक्के झाल्याचा दावा केला होता. त्याचवेळी मी आयुक्तांना पत्र लिहून केवळ २५ ते ३० टक्के नालेसफाई झाल्याचं स्पष्ट केलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवर विसंबून राहू नका, असा सल्लाही त्यांना दिला होता. अजून पाऊस आलेला नाही. तुम्ही स्वत: नालेसफाईच्या कामाची पाहणी करा आणि नालेसफाई करा, असंही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर २९ आणि ३० जून रोजी मी स्वत: नालेसफाईची पाहणी केली. यावेळी नाल्यांमध्ये चार फूट गाळ असल्याचं दिसून आलं. प्रशासनाने हा गाळ काढलाच नव्हता. अडिच लाख क्युबिक मीटर गाळ उपसल्याचा दावा पालिका करत आहे. पण मुंबईतील नाल्यासह मिठी नदीतही चार फूटाच्यावर गाळ आहे. मग पालिकेने कोणता गाळ उपसला? असा सवाल करतानाच पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम सुरू असून ही दिशाभूल तात्काळ थांबवावी, असं रवी राजा म्हणाले होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom