Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 10 जणांचा मृत्यू



मुंबई - राज्यात गणेश विसर्जनादरम्यान १० जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये चार जणांना, जळगावात तिघांना तर पुण्यात एकाला विसर्जनावेळी आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक तालुक्यात चौघांचा तर देवळा आणि निफाड तालुक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात एकीकडे गणेश विसर्जन सुरू असताना चार जणांच्या मृत्यूमुळे विसर्जन सोहळ्याच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. नाशिक तालुक्यात दारणा नदी संगमावर अजिंक्य गायधनी या तरुणाचा विसर्जनावेळी बुडून मृत्यू झाला. वालदेवी धरण परिसरात नरेश कोळी या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवन्त येथील रवींद्र मोरे यांचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला असून देवळा तालुक्यात प्रशांत गुंजाळ या जवानाचा विहिरीत गणेश विसर्जन करतेवेळी बुडून मृत्यू झाल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

नाशिकरोड येथे गणेश विसर्जनावेळी चेहेडी पंपिंग स्टेशन जवळ वालदेवी नदी पात्रात पडलेल्या मामा-भाच्यापैकी स्थानिक नागरिकांची ऐनवेळी मदत मिळाल्याने मामाचे प्राण केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचले. तर भाचा पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पाण्यात बुडालेल्यांत अजिंक्य उर्फ आदित्य राजाभाऊ गायधनी (वय २२) आणि चरण पुंडलिक भागवत (वय २८) रा. गजानन पार्क, खर्जुल मळा, नाशिकरोड या दोघांचा समावेश आहे. स्थानिक नागरिक अजिंक्यला वाचवू शकले नाही. मात्र चरण भागवतचे प्राण वाचले आहेत.

जळगावात गणेश विसर्जनावेळी गुळ नदीच्या पात्रात तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका चुलत भावाचा समावेश आहे. सुमित भरतसिंग राजपूत (वय २०), कुणाल भरतसिंग राजपूत (वय २२) तसेच ऋषिकेश रजेसिंग राजपूत (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेत मृत्यू झालेले सुमित आणि कुणाल हे दोघे सख्खे भाऊ आहेत तर ऋषिकेश हा त्यांचा काकांचा मुलगा होता. एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने राजपूत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारच्या सुमारास तिघे जण गणपती विसर्जनासाठी गुळ नदीवर गेले होते. गुळ नदीचा प्रवाह असलेल्या निजरदेवजवळ पाण्याचा डोह आहे. जोरदार पाऊस झाल्याने सध्या या डोहात खूप पाणी आहे. गणपती विसर्जनासाठी डोहाच्या पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाल्याची माहिती आहे.

पुणे येथील वाघोलीतील जाधव वस्ती येथील खाण येथे गेला होता. खाणीतील पाण्यात गणपतीचे विसर्जन करत असताना तो खाणीतील पाण्यात बुडाला. तत्काळ याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. दुपारी एक वाजून ३७ मिनिटांनी वर्दी मिळताच अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, कर्मचारी सुनील देवकर, धुमाळ, पोटे यांनी खाणीकडे धाव घेऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणाचे वडील एका इमारतीवर खासगी सुरक्षा रक्षकाचे काम करतात. याबाबत जाधव यांनी सांगितले की, तरुणाला पोहता येत असल्याची माहिती मिळाली असून, तो नेमका कसा बुडाला हे मात्र समजू शकले नाही.

जालना येथे दोन अल्पवयीन मुलांचा गणेश विसर्जनावेळी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. रवींद्र वाघमारे यांच्या शेतात ही घटना घडली.रोहनवाडी शिवारात सौरभ राजेश जैस्वाल (१६) व सिद्धार्थ रविंद वाघमारे (१६) अशी मृतांची नावे आहेत. जैस्वाल हा पाणिवेस येथील राहणारा होता तर सिद्धार्थ हा काद्राबाद येथील भाजी मंडी येथील राहणारा होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom