मुंबई, दि. १० : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८० हजार ००६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४० हजार ४१६ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३० कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७२ घटना घडल्या असून त्यात ८९८ व्यक्ती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. १०० नंबरवर १ लाख १३ हजार ९१० कॉल आले आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर १३४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९६,५६२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २३४ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २५९ पोलिस कर्मचारी, अधिकारी यांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.